औसा (जि. लातूर) : शिर्डी येथून हैद्राबादकडे परतणाऱ्या डुबली कुटुंबीयावर रविवारी पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला. लातूर-बीदर महामार्गावरील औसा ते लामजना दरम्यान वाघोली पाटीनजीक ट्रक आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
अपघातात वडिलासह मुलगी ठार झाली आहे. तर त्यांच्या कुटुंबातील इतर चाैघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.महामार्ग पाेलिसांनी सांगितले, हैद्राबाद येथील डुबली कुटुंब शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. शिर्डी येथील देवदर्शन करुन ते हैद्राबादकडे निघाले हाेते. दरम्यान, कार लातूर-बीदर महामार्गावरील औसा-लामजना परिसरात आली असता, वाघाेली पाटी येथे रविवारी पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास कारला कार (टी.एस. ०७ एफ.एल. ४९९४) आणि लामजन्याकडून औश्याकडे येणाऱ्या ट्रकची (एम.एच. १८ बी.एच. ४५८५) समोरासमोर जाेराची धडक झाली. कारमधील सांयकुमार डुबली (वय ५३) आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी तनविका सांयकुमार डुबली हे जागीच ठार झाले. तर कारमधील सुजाता सांयकुमार डुबली (४९), शैर्या डुबली (५), नविश श्रीकोंडा (११), तनिष श्रीकोंडा (१३ सर्व रा. हैद्राबाद) हे जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी लातुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
0 Comments