सोनाराकडून उधारीवर घेतलेल्या सोनसाखळीचे पैसे द्यायला लागू नये म्हणून त्याने मित्रांच्या साह्याने सोनाराचाच काटा काढला. हा खून नसून अपघात असल्याचा बनावही रचला. पण रायगड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपींना जेरबंद बंद केले.
कशेळे येथील राजेंद्र ज्वेलर्सचे व्यवसायिक हरीश ऊर्फ हरिसिंग माधोसिंग राजपूत हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नेरळ पोलिसांकडे नोंदवली होती. पोलिसांनी शोध घेतला असता जिते गावच्या हद्दीत त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात आढळून आला होता. त्यांची मोटर सायकल अपघातग्रस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या शरीरावर धारधार हत्यारांनी वार केल्याचे दिसून आले होते. यानंतर याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०२२ रोजी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पाचारण केले. यानंतर पोलीस निरीक्षक दयानंद गावडे आणि त्यांच्या पथकांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
0 Comments